पालघर : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता पालघर जिल्ह्याला तिसरा क्रमांक मिळाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे.
केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्यामार्फत पंतप्रधान गृहनिर्माण योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवानोन्नती अभियान राबवले जाते. याअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार दिले जातात. या वर्षी पहिल्या क्रमांकावर सातारा, पुणे, धुळे, नागपूर, हिंगोली आणि औरंगाबाद, तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी तेथील गरिबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे, संस्थेमार्फत गरिबांना वित्तीय सेवा पुरवणे, गरिबांची व त्यांच्या संस्थेची क्षमतावृद्धी व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून त्यांना दारिद्र्यनिवारणास मदत करणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.